बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

शाबास मोदीजी ...! काळ्या धनाला लावला लगाम ! #Demonitisation #BlackMoney # IndiaAgainstCorruption

प्रस्तावना :

काल रात्री ( मंगळवार दि. ०८/११/२०१६ )अख्ख्या जगाचे लक्ष अमेरिकेच्या निवडणुकीकडे लागलेले असताना माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी एक ऐतिहासिक दमदार पाऊल उचलले! भारतातील काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी ५००/- आणि १०००/- रुपयाच्या जुन्या नोटांना तडकाफडकी अवैध ठरवले. 'आमच्याकडें असलेल्या जुन्या नोटांचे काय?' या प्रश्नाने सामान्य नागरिक भांबावले. त्यातच दोन दिवस ATM बंद राहणार असल्याने सर्व बँकांच्या ATM  समोर लांबच लांब रांगा लागल्या. एकूणच, भरपूर वेळ अनेकांना या निर्णयाचा अर्थ न समजल्याने गोंधळाचे वातावरण होते. 

... पण नंतर घरी गेलो आणि सर्वप्रथम इंटरनेट open  केले. मा. पंतप्रधानांचे ३७ मिनिटांचे देशाला संबोधून केलेलं भाषण ऐकले. ते भाषण ऐकताना अंगावर रोमांच उभे राहत होते. या निर्णयाचा दूरगामी परिणामांचा विचार करताना मनात पंतप्रधांनांविषयी आदर मिनिटा मिनिटाला वाढत होता. इतका कणखर निर्णय घेणाऱ्या सरकारची किती प्रशंसा करू आणि किती नको असे झाले होते!

या बरोबरच पूर्ण माहिती नसताना , गोष्टी समजून न घेता सवयीप्रमाणे 'सरकार'ला शिव्या घालणाऱ्या 'सुजाण' नागरिकांच्या बुद्धीची कीव  येत होती. त्यामधल्या ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना ' पंतप्रधानांचे पूर्ण भाषण ऐका' हे आवर्जून सांगत होतो. 'कोणी आता ५००/-/ १०००/- च्या जुन्या नोटा दिल्या तर घेऊ नका' हे सांगत होतो. तरीही , समाधान होत नव्हते! तेव्हा या निर्णयाबद्दल भरभरून येणारे विचार लिहायला बसलो. सर्वप्रथम आपण समजून घेऊ की मा. पंतप्रधानांनी नेमकी काय घोषणा केली. संपूर्ण भाषणाची Internet लिंक खाली जोडत आहे. अगदी आजच नको ,पण वेळ काढून जरूर बघा.

(Internet लिंक :  PM  Modi's address to the nation : https://youtu.be/zmwQWe-jA_4 , वेळ: १ तास २ मिनिटे )

 मंगळवार दि. ०८/११/२०१६ च्या भाषणातील घोषणा (थोडक्यात) :

*  मंगळवार दि. ०८/११/२०१६ रात्री १२ वाजल्यापासून जुन्या ५००/- आणि १०००/- रुपयाच्या नोटा अवैध ठरतील. 
* सामान्य नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या कडे असलेल्या जुन्या नोटा दि. ३०/१२/२०१६ पर्यंत (५० दिवसात) स्वतःच्या बँका आणि पोस्ट ऑफिस मधील खात्यात जमा करता येतील .
* दिवसाला जास्तीत जास्त ४०००/- रुपयाच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील.  
* या काळात आपण स्वतःच्या गरजेसाठी बँकेतून दिवसाला १०,०००/- तर आठवड्याला २०,०००/- रुपये काढू शकतो. 
* काही कारणास्तव दि. ३०/१२/२०१६ पर्यंत जुन्या नोटा जमा करणे शक्य न झाल्यास दि. ३०/०३/२०१७ (अधिक ३ महिने) पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत केंद्रात तुमच्याकडच्या जुन्या नोटा जमा करण्याची सुविधा उपलब्ध होईल. 
* याला अपवाद म्हणून ज्यांचे नातेवाईक रुग्णालयात आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासकीय रुग्णालये आणि शासकीय औषधाच्या दुकानांमध्ये फक्त गोळ्या-औषधे विकत घेण्यासाठी जुन्या नोटा आणखी ३ दिवस म्हणजे दि. ११/११/२०१६ पर्यंत वैध असतील. 
* ५००/- आणि १०००/- रुपयाच्या जुन्या नोटांव्यतिरिक्त इतर सर्व १००/- ५०/- १०/- ५/- १/- च्या नोटा आणि सर्व नाणी यांचे चलन पूर्वीप्रमाणेच चालू राहील. 
* आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्व काळात cheque / नेटबँकिंग/ online वित्त व्यवहार नेहमीप्रमाणे चालू राहतील. सामान्य नागरिकांना या सुविधा नेहमीप्रमाणेच वापरता येतील. 

...एकूणच सामान्य प्रामाणिक नागरिकाला या इतक्या मोठ्या निर्णयाचा काहीच त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. 

या निर्णयाचे दूरगामी परिणाम :

आता आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे की ५००/- आणि १०००/- च्या नोटांवर बंदी आणल्याने काळा पैसे नष्ट होणार कसा ?

... मित्रांनो, काळा पैसा- बनावट नोटा - दहशदवाद - महागाई - जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर या सर्वांचा आपापसात खूप जवळचा संबंध आहे. एका सामान्य भारतीय नागरिकांकडे घरात आणि बँक लॉकर मध्ये वगैरे स्वतःला आवश्यक त्यापेक्षा थोडेसे जास्त पैसे असतात, त्यात काहीही गैर नाही! पण, अनैतिक मार्गाने पैसे कमावणारे आणि साठवणाऱ्यांकडे अशा प्रकारे खूप जास्त रक्कम लपवून ठेवलेली असते! ५००/- आणि १०००/- या नोटांची value जास्त असल्याने, जास्तीत जास्त काळे धन या नोटांच्या स्वरूपात साठविले जाते. ...आता साहजिकच ना ! मला जर चोरीचे १ लाख रुपये लपवून ठेवायचे आहेत तर १०/-, २०/- रुपयाच्या हजारो नोटा लपवेन की १०००/- च्या १०० नोटांचा बंडल लपवीन ? ...उत्तर तुम्हाला माहितेय! 

याच प्रकारे काही 'महाभागांनी' अशी अरबो रुपयांची गंगाजळी लपवून ठेवलेली आहे! काल रात्री नंतर या सर्व धनाची किंमत शून्य झाली आहे. बँका आणि पोस्ट ऑफिस मधील खात्यात जमा करता येण्या जोग्या रकमेवर कमाल मर्यादा लावून माननीय पंतप्रधानांनी त्यांचे काळे धन पांढरे करता येणार नाही याची काळजी घेतली! 

मा. पंतप्रधांनी केलेली वेळेची अचूक निवड : 
कोणताही मोठा निर्णय अचूक होण्यासाठी तो 'उचित वेळेची निवड' खूप महत्त्वाची ठरते. त्या अनुषंगाने कालच्या दिवसाची आणि तीही संध्याकाळीच घोषणा का करण्यात आली याचे महत्त्व जाणून घेऊया...

* दिवाळीचा मोठा सण नुकताच होऊन गेला. त्यामुळे तुमच्या आमच्याकडचे अधिक ते पैसे आपण खर्च केलेले आहेत. त्यामुळे घरी मोठ्या किमतीच्या नोटा फार कमी राहिल्यात. आणि ज्या थोड्या उरल्यात त्या आपण सोयीस्कररित्या स्वतःच्या खात्यात जमा करू शकतो.
* काळे धन स्वतःहून घोषित करायची शेवटची तारीख (दि. ३०/०९/२०१६) महिन्याभरापूर्वी मागे पडली. 'आमचे काळे धन वाचले' अशा खुशीत गाजरे खाणाऱ्यांना सणसणीत चपराक बसली. त्याइतकेच महत्त्वाचे म्हणजे, चुकीला माफी नाही हि शिकावं देऊन सामान्य नागरिकाचा system वरचा विश्वास वाढवला.
* जगाचे (विशेषतः या महाठगाचें) लक्ष अमेरिकेच्या निवडणुकीकडे लागले असल्या कारणाने असा कोणताही निर्णय त्यांना अनपेक्षित होता. त्यामुळेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या Surgical strike पेक्षा हा master stroke लक्षगुणे पॉवरफुल आहे. 
* ही  बातमी संध्याकाळी ७ नंतर बाहेर आली आणि १२ वाजता नोटा अवैध झाल्या . त्यामुळे 'ठगांना' काहीही करण्याची संधी फारशी मिळाली नाही.
* सर्वात महत्वाचे म्हणजे दुसऱ्या दिवशी उठून कामावर जाणारा सामान्य नागरिक रात्रभरात 'सावध' झाल्यामुळे कोणत्याही फसवणुकीला बळी पडणार नव्हता.

... एकूणच, अतिशय well -planned आणि well -timed खेळी खास मोदी-शैलीत खेळली गेली.

पुढच्या काही दिवसात सामान्य नागरिकांनी घ्यायची काळजी : 

* घाबरू नका!  
* ' आपले पैसे वाया गेले' / 'ATM  मधले पैसे संपले' अशा अफवांना बळी पडू नये. सामान्य नागरिकाला त्रास होईल असा कोणताही निर्णय सरकार घेणारच नाही हा ठाम विश्वास या आणि पुढच्या काळात आपण ठेवुया.
' मी तुला ५००/- देतो, मला फक्त ४००/- दे' अशी मस्करी आमच्या ट्रेनच्या डब्यात चालली होती. पण अशा गोष्टी मोठ्या प्रमाणावर व्हायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावध राहावे! , त्यांच्या पापात आपल्याला सहभागी करायचा हा प्रयत्न आहे, हे ओळखून आपण अशा प्रलोभनांना बळी पडू नये.
* कुठेही नोटांनी भरलेली बॅग/ पिशवी दिसल्यास ती उचलायचा मोह नको! त्यात बॉम्ब सारख्या गोष्टी ठेवल्या जाऊ शकतात.
* एकूणच, ' मेहनतीने आपण लाखो-करोडो कमावू, पण चुकीच्या मार्गाने येणारा एक रुपयाही नको' ही भारतीय घराघरात दिली जाणारी नैतिकतेची शिकवण प्रत्यक्षात आणण्याचा हा काळ आहे.

...शेवटी लक्षात ठेवा की काळ्या धनाविरुद्ध लढाई आपली प्रत्येकाची आहे.  तर चला मग या शुद्धीकरणाच्या महायज्ञात आपणही आपला खारीचा वाटा उचलुया.

पुढच्या काळात असे अनेक निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यावेळी कोणत्याही अफवांनी विचलित न होता एका सुजाण आणि जबाबदार नागरिकांची भूमिका आपण सर्वच निभावूया. तसेच, हे देशद्रोही/नतद्रष्ट/वाईट लोक कोणत्याही जात/धर्म/देशाचे नसतात. हे गप्प बसणार नाहीत! ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे आपल्या सरकार आणि देशाच्या विकास व संरक्षणासाठी आपापल्या देवांना 'देव मदत करेलच!' या विश्वासाने प्रार्थना करूया. शेवटी म्हणतात ना ...' मारणाऱ्यापेक्षा वाचवणाऱ्याची ताकद जास्त असते'. आई जगदंबेच्या कृपेने माझ्या महान देशात लवकरच रामराज्य येवो!

युद्धकर्ता श्रीराम: मम् । समर्थ: दत्तगुरु: मूलाधार: । 
साचार: वानरसैनिक: अहं । रावणवध: निश्चित: ।।... इति अनिरुद्ध महावाक्यम ...

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

प्लेटलेट्स दान (platelets donation) श्रेष्ठ दान!


प्लेटलेट्स दान (platelets donation) श्रेष्ठ दान!

प्रस्तावना : 
आपण रक्तदान, अवयव दान अगदी देहदानही ऐकले असेल. पण प्लेटलेट्स दान यासंबंधी फार कमी जनजागृती झालेली आढळते. खालील लेख तुम्हाला प्लेटलेट्स दानासंबंधी यथासांग माहिती देऊन त्याचे महत्त्व तुम्हाला पटवून सांगेल.

गेल्या गुरुवारी मला एका स्वयंसेवी संस्थेकडून platelets donation चा कॉल आला. खूप वर्षांपूर्वी मी तसा फॉर्म भरला होता. दुसऱ्या दिवशी कामावर तसे कळवून मी सकाळीच चर्नी रोडच्या हरकिसनदास हॉस्पिटलला पोहोचलो. सर्वप्रथम त्यांनी माझी प्राथमिक तपासणी म्हणजे वजन इत्यादी केली. त्यानंतर माझे थोडे रक्त काढून रक्तपसणीसाठी पाठवण्यात आले. या रक्तपासणीत रक्तदात्याला कावीळ/कॅन्सर/AIDS/गुप्तरोग आहे का, तपासले जाते. 

रक्ततपासणीचा निकाल यायला अर्धा तास होता. त्यावेळात मला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. माझ्याही मनात platelets donation संबंधी ज्या शंका होत्या त्यांचे मी निरसन करुन घेतले. यापूर्वी रक्तदान अनेक वेळा केले असले तरी platelets donationची ही पहिलीच वेळ! त्यामुळे उत्सुकता होती. डॉक्टरांकडून सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे घेऊन आणि त्या प्रक्रियेच्या सुरक्षेची पूर्ण खात्री पटल्यानंतरच मी संमती दिली. आता आपण platelets donation म्हणजे नक्की काय आणि नेहमीच्या रक्तदानापेक्षा काय वेगळे असते हे जाणून घेऊ.

प्लेटलेट्स दान प्रक्रिया:
सामान्य रक्तदानात(whole blood donation) आपले 300-350 मिली रक्त काढले जाते. पुढे ते केंद्रपसारी संयंत्रात (centrifuge machine) फिरवले जाते ज्यामुळे रक्तातील लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा हे घटक वेगळे केले जातात. ते तीन वेगवेगळ्या रुग्णांना दिले जाऊ शकतात. म्हणूनच तर 'एक रक्तदान तीन जीव वाचवते' असे म्हणतात!

पण कॅन्सर, मलेरिया इ. रोगांमध्ये आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते आणि रुग्णाच्या जीविताला धोका उत्पन्न होतो. यावेळी भरपूर प्रमाणात प्लेटलेट्सची आवश्यकता असते, जी एका रक्तदात्याने केलेल्या रक्तदानातून मिळणाऱ्या प्लॅटलेट्सने पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून  platelets donationची वेगळी पद्धत अवलंबिली जाते.

या प्रक्रियेमध्ये आपले रक्त 'apheresis machine' मध्ये पाठविले जाते.ही मशीन त्या रक्तातील फक्त प्लेटलेट्स काढून घेऊन बाकीचे रक्त शरीरात परत पाठविते...ही प्रक्रिया  आवश्यकतेनुसार 7 ते 8 वेळा repeat केली जाते. या पूर्ण platelets donation प्रक्रियेला एकूण एक ते दीड तास लागतो. बाकी काहीही त्रास होत नाही! इतका जास्त वेळ एकाच जागी झोपावे लागणार असल्यामुळे मनोरंजनासाठी TV/movies ची सोय असते.


                                                       (छायाचित्र : apheresis machine)

 Platelets donationची वैशिष्ट्ये : 
* तुमचे आरोग्य चांगले आहे हे तापासल्यानंतरच तुम्हाला प्रक्रियेसाठी पात्र ठरविले जाते. तसेच फक्त प्लेटलेट्स काढून बाकीचे रक्त परत शरीरात पाठविले जाते त्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहते.
* या प्रक्रियेमुळे तुमचे रक्त/प्लेटलेट्स कमी होत नाहीत. Platelets donation नंतर 3 दिवसांनी प्लेटलेट्स दान/ रक्तदान करू शकता. रक्तदान (whole blood donation) नंतर आपण 3 महिने रक्तदान/ प्लेटलेट्स दान करू शकत नाही.
... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे...
* तुम्ही platelets donation केल्यानंतर ते पूर्ण kit बदलले जाते त्यामुळे रक्तसंक्रमणामुळे होणारया रोगांची भीती राहत नाही.

हा लेख लिहिण्याचा मुख्य हेतू हाच की केवळ अज्ञान किंवा गैरसमजांमुळे रक्तदानासारख्या पवित्र कार्यापासून आपण दूर राहू नये. आजच्या प्रगत युगातही एकूण पात्र दात्यांपैकी केवळ 2% माणसे रक्तदान करतात. platelets donation बद्दल तर क्वचितच कोणाला माहित असेल.
खरंच आपण जेव्हा हे platelets donation करू तेव्हाच आपल्याला देवाने दिलेल्या सुदृढ शरीराचा सदुपयोग केल्याचे समाधान मिळते.

...तर मग चला करूया प्लेटलेट्स दान!


                                                            (छायाचित्र : प्लेटलेट्स दान)

।।अंबज्ञ।।

शनिवार, १६ जुलै, २०१६

सोमनाथ - गिरनार यात्रा Somnath-Girnar yatra - एक दिव्य अनुभव, जून २-५, २०१६ (उत्तरार्ध- गिरनार दर्शन)

सोमनाथ - गिरनार यात्रा Somnath-Girnar yatra - एक दिव्य अनुभव, जून २-५, २०१६ (प्रथमार्ध - सोमनाथ  दर्शन) वाचण्यासाठी link  खाली देत आहे....

http://mohanayare.blogspot.in/2016/07/somnath-girnar-yatra.html

-:पुढे चालू:-

 'अनिरुद्ध एव बुद्धिदाता ।'

प्रथमार्धात सोरटी-सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात त्या गिरनार यात्रेला निघू. 

!!जय गिरनारी !!  

सोमनाथवरून ट्रेनने प्रवास करताना जुनागढ जसजसे जवळ येऊ लागते तास गिरनार पर्वताचा पहिला डोंगर दिसू लागतो. हो, आता 'पहिला डोंगर' असा विशेष उल्लेख करायचे कारण असे की एकूण २ डोंगर चढून उतरल्यावर गुरुशिखर (मुख्य दत्त मंदिर) ३ऱ्या डोंगरावर आहे! 



                             (छायाचित्र : 'तलेटी' गावातून दिसणारा गिरनार पर्वताचा 'पहिला' डोंगर )


जुनागढला उतरून टमटम रिक्षाने गिरनार पायथ्याशी असलेल्या 'तलेटी' गावात पोहोचता येते. या टमटम रिक्षाच्या प्रवासात हळूहळू जवळ येणारा गिरनार पर्वत दत्तदर्शनाची लालसा सतत वाढवत राहतो. 'तलेटी' गावात दत्त भक्तांची अतिशय माफक दरात राहण्याची सोय करणाऱ्या अनेक धर्मशाळा आहेत. दुपार-रात्रीच्या जेवणासाठी अनेक स्वस्त hotels आहेत. 

आम्ही संध्याकाळी ०६:००-०६:३० च्या सुमारास एक धर्मशाळेत उतरलो. गिरनार चढायला रात्री ११:०० वाजता सुरुवात करायची असल्याने हातात चांगले ४-५ तास होते. या वेळेचा सदुपयोग गिरनार पर्वताचे photos काढण्यासाठी आणि 'तलेटी' गावात फेरफटका मारण्यासाठी करायचे ठरले. 

'तलेटी' गावातील भवनाथ महादेव मंदिर हे आवर्जून दर्शन घ्यावे असे आहे. पूर्ण सोनेरी रंगाने रंगवलेले हे मंदिर रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या रंगबेरंगी प्रकाशयोजनेत विशेष खुलून दिसते. आणि रात्रीच्या वेळी पुन्हा दर्शनाला गेलो तेव्हा दोन्ही ओंजळीभर मिठाई-फळे असा प्रसाद भेटला. 



 (छायाचित्र : 'तलेटी' गावातील भवनाथ महादेव मंदिर ) 


                  (छायाचित्र : 'तलेटी' गावातील भवनाथ महादेव मंदिरातील जिवंत भासणारी दत्तमूर्ती) 



                      (छायाचित्र :रात्रीच्या प्रकाशयोजनेत उजळून निघालेले भवनाथ महादेव मंदिर )


रात्रीचे जेवण उरकून आम्ही गिरनार चढाईला सिद्ध झालो. प्रत्येकी ३ ली. पाणी, glucon-D, भरपूर सुका खाऊ आणि चॉकोलेट्स अशी जय्यत तयारी असलेली बॅग व हातात काठी सोबत घेतली. इथे भक्तांनी लक्षात घ्यावे की एकदा चढायला सुरुवात केली की वाटेत कोणतीही दुकाने, toilet अशा कोणत्याही सुविधा नाहीत. (वाटेत दुकाने आहेत, पण ती रात्रीची बंद असतात!)....त्यामुळे खाणे-पिणे सोबत घ्यायचे आणि बाकी नैसर्गिक विधी...'जंगलमे मंगल'!  


रात्री बरोबर १२ वाजता चढाईला सुरुवात केली. प्रत्येक पायरीबरोबर रात्रीच्या गारव्यातही अंग घामाने निथळून निघत होते. एकूणच mixed age group असल्याने चढणे हळूहळू होत होते. सोबत चालणाऱ्या प्रौढ भक्तांना दम लागत होता पण दत्त दर्शनाची आतुरता वरचढ होती. या सर्वांचा उत्साह पाहून आम्हा तरुणांनाचा उत्साहही द्विगुणित होत होता. 


थोड्याथोड्या अंतरावर थांबत पण अनिरुद्ध गतीने प्रवास चालू होता. रात्रीचा सुखद गारवा खूपच आल्हाददायक होता. हळूहळू जशी उंची वाढत गेली तास हवेतील गारवा वाढत होता. अंगावरचा घाम कधीच सुकून आता थंडीला सुरुवात झाली होती. जुनागढ railway stationवरून पाहिलेला पहिला डोंगर आता अर्ध्याअधिक चढून झाला होता. मागे वळून पाहता तलेटी आणि जुनागढ शहराच्या lights रात्रीच्या अंधारात दिसत होत्या.शरीराला instant energy  मिळावी म्हणून Glucon-D/चॉकोलेट्सचा खुराक चालू होता. एकमेकांना प्रोत्साहित करत, गाणी / गजर म्हणत, jokes मारत चढाई चालू होती. 


रात्रीचे धुके आता खाली दिसत होते, म्हणजे आम्ही ढगांच्या वरच्या पातळीला होतो. रात्रीच्या अंधुक प्रकाशात ते ढगांचे दृश्य अवर्णनीय होते. आणि ढगांच्यावरची उंची गाठणे ही achievement होती. एक डोंगर सर झाला होता आणि दुसरा समोर दिसायला सुरुवात झाली होती. ...थोडा वेळ थांबलो, ते दृश्य डोळ्यात साठवून मगच पुढे निघालो.  


आमच्याव्यतिरिक्त आणखीही काही groups चढाई करत होते. पण ते फार मागे राहिले होते. एका ठिकाणी असच विश्रांतीसाठी थांबलेलो असताना सिंहाचे गुरगुरणे स्पष्ट ऐकू आले. लगेच उठलो आणि चालायला लागलो. थरारक क्षण होता तो! पुढे थोडे चढल्यावर अंबाजी माता मंदिर, जैन मंदिर लागले. चढाईचा एक तृतीयांश भाग मार्ग मागे पडला होता. तिथून पुढचा चढाईचा खूप मोठा टप्पा दिसू लागला.(जो तलेटी गावातून दिसत नाही )


इथे आवर्जून सांगावेसे वाटते की रात्री चढाई करण्याचा फायदा हा की आपण किती अंतर चाललो आणि विषेशतः किती अंतर अजून पार पडायचेय याचा अंदाज रात्रीच्या अंधुक प्रकाशात येत नाही. त्यामुळे 'अरे अजून किती दूर चालायचेय?' या विचाराने येणार मानसिक थकवा जाणवत नाही! तसेच, तितकाच महत्त्वाचा मुद्दा हा की रात्रीच्या आल्हाददायक थंड वातावरणात शारीरिक थकवाही खूप कमी जाणवतो. दुपारच्या भर उन्हात हीच चढाई अनेक पटीने कठीण असते. 


पहाटेचा ब्रह्ममुहूर्त ०३:२० झाले. तेव्हा होतो त्या ठिकाणी थोडीशी उपासना केली. त्या प्रसन्न वातावरणात उपासना करायचा अनुभव मस्त होता. अंबाजी माता मंदिरासमोरील डोंगर पूर्ण चढून गेल्यावर थोडेसे खाली उतरायचे आहे. त्यानंतर 'गोरक्षनाथ टोक' असलेला डोंगर दिसू लागतो. त्याचा चढ पूर्ण चढलो. आता हवेतील गारवा चांगलाच वाढला होता, थंडी वाजायला सुरुवात झाली होती. रात्रीच्या अंधारात तिकडे असलेली गोरक्षनाथ गुंफा आणि लहानसे मंदिर नीट पाहता आले नाही . कारणही तसेच होते...समोर 'गुरुशिखर' दिसायला लागले होते! 


... तो आनंद अवर्णनीय होता! 

...पण, समोर दिसणारा डोंगरही खूपच उंच होता. आणि आम्ही उभे असलेला 'गोरक्षनाथ टोक' असलेला डोंगर पूर्ण उतरून तो 'गुरुशिखराचा' डोंगर चढायचा होता. हा शेवटचा टप्पा तीव्र उतार आणि लगेचच तीव्र चढ असा आहे. तरीही, 'दत्तबाप्पाने इतके करवून घेतले, आता हा टप्पाही 'तो'च पार करवून घेईल', हा दृढविश्वास होता.
आता गुरुशिखराचा डोंगर चढायला सुरुवात केली. थंडगार वाऱ्याबरोबर थकवा कुठच्या कुठे उडून गेला होता! दत्त दर्शनाची आतुरता पाऊला पाऊलाला वाढत होती. नकळत मुखी चाललेल्या जपाचा वेगही वाढला होता. 

रात्री १२:०० वाजता चढायला सुरुवात केलेली, आता पहाटे ०५:३०च्या सुमारास दत्तशिखरावर होतो. दत्त मंदिर ०६:००ला उघडते. ठरल्याप्रमाणे मंदिर उघडायच्या आधीच आम्ही पोहोचलो होतो. आमच्या आधी १२-१५ भक्त रांगेत उभे होते. मंदिर उघडायला १५-२० मिनिटे वेळ होता. त्या वेळात आमच्याकडून दत्तमाला मंत्र, दत्तबावनी, घोरकष्टोद्धरण स्तोत्र, 'ओम द्राम दत्तात्रेयाय नमः', 'अनसूयोत्रि संभूतो...' असे सर्व जप दत्तबाप्पाने करवून घेतले. आतून पूजा/ आरतीचा आवाज येत होता. 
  

 (छायाचित्र : पहाटेच्या प्रकाशात दिसणारा 'गुरुशिखराचा' डोंगर, P.C. vishalsinh khetle FB album) 


 (छायाचित्र : गोरक्षनाथ टोकावरून दिसणारे सूर्योदयाचे विहंगम दृश्य, P.C. vishalsinh khetle FB album) 

मंदिर त्या दिवशी १०मिनिटे आधीच उघडले. आम्ही आत गेलो. आकार पाहता, गिरनार गुरुशिखरावरील दत्तमंदिर एखाद्या societyतील देऊळही खूप मोठे वाटावे इतके लहान होते. पण, दत्तबाप्पाने १२,००० वर्षे केलेल्या तपश्चर्येने पावन झालेल्या त्या जागेची महती अपरंपार होती! तेथील पाषाणावर दत्तबाप्पाच्या पादुका उमटल्या आहेत. पादुकांमागे २-२ १/२ फूट उंच दत्तबाप्पाची लोभस मूर्ती आहे. आम्ही सगळ्यांनी शांतपणे दर्शन घेतले आणि लोटांगण घातले. दत्तबाप्पाच्या मूर्तीमागे लहानसे 'गुप्तेश्वर महादेव' नावाचे लहानसे शिवलिंग आहे. सर्व दर्शन ५-७ मिनिटात आटोपून इतर भक्तांबरोबर मंदिराबाहेरही पडलो.



                        (छायाचित्र : गिरनार गुरुशिखरावरील दत्तबाप्पाच्या पादुका , source internet)



              (छायाचित्र : गिरनार गुरुशिखरावरील दत्तबाप्पाच्या पादुका आणि मूर्ती, source internet)


गुरुशिखर मंदिरात आलेला विशेष अनुभव : 


मंदिरातून बाहेर पडताच मनात विचार आला 'अरे जिथे येण्यासाठी इतके कष्ट घेतले त्या दत्तबाप्पाच्या मंदिरातून इतक्या लवकर परतण्यात काय logic आहे?, अजून थोडा वेळ तरी नको का घालवायला?' ... मग काय आम्ही सगळे 'पीछे मूड' करून पुन्हा मंदिरात आलो. पुन्हा, शांतपणे दर्शन घेतले आणि लोटांगण घातले. दत्तबाप्पाच्या मूर्तीकडे आणि विशेषतः पादुकांकडे पुन्हा पुन्हा पाहत होतो. आता काय तिकडून पाय निघत नव्हता! इतक्या दूरचा प्रवास करून हा क्षण जगण्यासाठी तर आलो होतो! परतीची train रात्री पकडायची होती तसेच आमच्या group मधील बाकी सगळे मागे होते.घाई तरी कशा साठी करायची? ...मग काय, ज्याला जी सुचेल ती उपासना म्हणत राहिलो.


तिकडे असलेल्या पुजाऱ्याची मात्र अस्वस्थता वाढत चाललेली. एक तर आमच्यापैकी कोणी त्याला काही पैसे दिले नव्हते आणि कोणीही त्याच्या पाया पडले नव्हते. आम्ही इतर 'चांगल्या' भक्तांप्रमाणे दर्शन घेऊन निघत नव्हतो. आम्ही आमच्या आजोबाला भेटण्यासाठी पुन्हा पुन्हा येत होतो,जागेवरून हालत नव्हतो. त्यामुळे त्याचे चिडणे स्वाभाविक होते. असो, मग आम्ही कोपरे-आड जागा पकडून पण मंदिरातच हिय्या मांडून होतो.  


'मुखी जप, लक्ष चरणांकडे स्थिर' अशा अवस्थेत असतानाच तेथे कुठून कोण जाणे एक सर्पराज आला. माझ्या बाजूला उभ्या असलेल्या मित्राच्या हे लक्षात आले. माझी आई आणि इतर काही काकू तिकडेच उभ्या होत्या म्हणून त्यांना इशारा देऊन आम्ही सावध केले. ते त्या सर्पराजापासून थोडे दूर झाले. पण तो सर्पराज वेगळाच agenda घेऊन आलेला होता. तो अतिशय संथ गतीने पुजाऱ्याच्या दिशेने सरकू लागला. तो पुजारी जणू अधिकारवाणीने हातातील लोटा आपटत "नागराज, चले जाओ नागराज" असे बोलू लागला. कदाचित 'नागराजही माझे ऐकतो' हे दाखवायचा तो प्रयत्न करत असावा. पण झाले उलटेच! त्याच्या त्या ओरडण्यामुळे आणि लोटा ठोकावण्याने तो सर्पराज अतिशय संथ गतीने त्या पुजाऱ्याच्या अधिकाधिक जवळ जाऊ लागला. आता मात्र त्या पुजाऱ्याची तारांबळ उडाली.एका हाताने आपली लुंगी सांभाळत दुसऱ्या हाताने लोटा ठोकावीत तो आपल्या जागेवरून उठून त्या सर्पराजपासून दूर जाऊ लागला. "नागराज, चले जाओ नागराज!". अधिकारवाणी जाऊन आता त्याच्या आवाजात अगतिकता आली होती. मंदिरात असलेला एकमेव सुरक्षारक्षक त्याच्या मदतीला आला. नंतर तो सर्पराज त्याच्या त्याच अतिशय संथ गतीने दत्तबाप्पाच्या मूर्तीमागून गुप्तेश्वर महादेवाकडे सरकू लागला आणि त्या लिंगाभोवती स्थिरावला. 

हा प्रसंग इतका detail मध्ये वर्णन करायचे कारण इतकेच की या सगळ्या वेळात त्या कटकट करणाऱ्या पुजाऱ्याचे आणि सुरक्षारक्षकाचे पूर्ण लक्ष आमच्याकडून त्या सर्पराजाकडे divert झाल्यामुळे आम्हाला निर्घोरपणे सर्व उपासना शांतपणे करता आल्या, ही दत्तबाप्पाचीच करणी!

जवळपास २५-३०मिनिटे उपासना केल्यानंतर पूर्ण तृप्त मनाने आम्ही पुन्हा एकदा दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडलो.

मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने, आता नाही देव काही अन्य मागणे।।धृ।। 

हे गाणे वारंवार आठवत होते.'लवकरच परत घेऊन ये' हे दत्तबाप्पाला सांगायला आम्ही विसरलो नाही. 

बाहेर येऊन पाहतो तर आणखी एक अतिशय सुंदर देखावा आमची वाट पाहात होता. सूर्य उगवून पूर्ण उजाडले होते. मंदिरात जाताना अंधार असल्यामुळे आजूबाजूचा सुंदर परिसर नीट पाहता आला नव्हता. गुरुशिखराभोवतालचा सुंदर निसर्ग आता नजरेत मावत नव्हता. छोट्या छोट्या टेकड्यांवरून पुढे सरकणारे ढग एखाद्या मऊमऊ कापसाच्या बिछान्यासारखे भासत होते. सकाळच्या कोवळ्या उन्हाने आकाशात लाल-पिवळ्या-भगव्या-निळ्या-जांभळ्या रंगांची मुक्त उधळण केली होती. ते सुंदर दृश्य आमचे अधीर डोळे अधाशासारखे पीत होते. किती photo काढले पण समाधान काही होईना. कोणताही camera ती सुंदरता साठवून ठेवायला अपुरा होता. 'देवाने दिलेले डोळे हाच जगातील सर्वश्रेष्ठ camera आहे!', ही गोष्ट आज पुन्हा जाणवली. भरपूर photos काढून खाली यायला निघालो. 





                                            (छायाचित्रे: गुरुशिखराभोवतालचा सुंदर निसर्ग)


गुरुशिखराचा डोंगर उतरून आल्यावर खाली 'दत्तबाप्पाची अखंड धुनी' आहे. दर सोमवारी या धुनीत समिधा भरल्या जातात. थोड्या वेळाने या समिधा आपोआप पेट घेतात. आजही हा सोहळा दर सोमवारी 
सकाळी ७:०० वाजता अनुभवता येतो. याच ठिकाणी थोडे खाली उतरून गेल्यावर कमंडलू तीर्थ  आहे. या प्रदेशातील पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. तेथील कमंडलू तीर्थ हाच पाण्याचा एकमेव स्रोत आहे. असे सांगितले जाते की तपश्चर्या चालू असताना दत्तबाप्पाने त्याच्या हातातील कमंडलू गुरुशिखरावरून खाली फेकला त्यामुळे जे तीर्थ तयार झाले तेच हे कमंडलू तीर्थ! एक छोटा झरा इथे वर्षभर वाहत असतो.तिकडच्या आश्रमातले सेवेकरी येणाऱ्या भक्तांना वर्षभर चहा आणि अल्पोपहार विनामूल्य देत असतात. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही त्यांची सेवा नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.


                                         (छायाचित्र: गोरक्षनाथ टोकावरून दिसणारे गुरुशिखर ) 


                                    (छायाचित्र: शेवटचा टप्पा तीव्र उतार आणि लगेचच तीव्र चढ ) 


                                                             (छायाचित्र: गिरनार पायऱ्या)


                                                  (छायाचित्र: गिरनार वाटेतील सुबक मंदिरे) 


(छायाचित्र: तलेटी आणि जुनागढ शहराचा देखावा ) 

मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. रात्री अंधारामुळे अंधुक दिसलेल्या गिरनार पर्वताच्या प्रदेशाचे सौंदर्य न्याहाळत, वाटेतील सुबक मंदिरे पाहत आम्ही उतरत होतो. वयोवृद्ध माणसांना गिरनार पर्वत दर्शन घ्यायचे असल्यास 'डोली'ची सोय आहे. जाऊन-येऊन वजनाप्रमाणे १०,०००-१५,००० रुपये ते घेतात. पण खरंच जिथे स्वतःला चढणे इतके कठीण आहे तिथे ५०-८० किलोच्या माणसांना घेऊन जाणारे डोलीवाल्यांच्या मेहनतीला सलाम! 

अखेर दुपारी १२:२० वाजता आम्ही पुन्हा पायथा गाठला. 'अवधूतचिंतन श्रीगुरुदेवत्त'चा जयघोष करून आम्ही आनंद साजरा केला. lunch करून roomवर आलो. गिरनार चढाई आणि उतरण्याचे प्रसंग आठवत होतो. गुरुशिखरावरील अनुभव एकमेकांना सांगत होतो. आंघोळ करून थोडावेळ विश्रांती घेतल्यानंतर भरपूरसा शीण निघून गेला. 

संध्याकाळी पुन्हा त्या भव्य गिरनार पर्वताकडे पाहताना मन भरून येत होते. हा एवढा मोठा पर्वत आपण चढून-उतरलो याबद्दल एकदा स्वतःचीच पाठ थोपटावी वाटल. दत्तबाप्पाने इतके करवून घेतले, म्हणून त्याला 'अंबज्ञ' म्हटले. संध्याकाळी ७:३० वाजता निघायचे होते. पण मन वळून वळून त्या भव्य गिरनार पर्वताकडे पाहत होते. 'पुन्हा तुला भेटायला येईनच, तूच घेऊन ये' असे मनोमन सांगत आम्ही टमटमने निघालो. एखाद्या माहेरवाशिणीसारख तो पर्वत दृढीआड होईपर्यंत त्याला वारंवार पाहत होतो. 

पुढे जुनागढ railway station जवळच एक हॉटेलात सुग्रास 'गुजराती थाळी' enjoy केली आणि रात्री ०९:१५ वाजताची 'सोमनाथ एक्सप्रेस' पकडली. 


                  (छायाचित्र : जुनागढ railway station जवळच एका हॉटेलातील सुग्रास 'गुजराती थाळी')

येतानाप्रमाणेच अहमदाबादला train बदलली आणि बांद्रा टर्मिनसला येणारी 'सयाजी नगरी एक्सप्रेस' पकडली.गाडीत वालसाडजवळ आंबे-चिकू यांची shopping झाली. रविवारी ५ जून दुपारी ०२:३० च्या सुमारास सर्व बांद्रा टर्मिनसला उतरले. एक groupie काढून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. सोमनाथ - गिरनार यात्रेच्या अनेक सुखद आठवणी घेऊन 'पुन्हा भेटू, पुढच्या गिरनार यात्रेला!' असे म्हणत आपआपल्या घरी परतलो.


                                                  (छायाचित्र : सोमनाथ - गिरनार यात्रा ग्रुप )

रविवार, १० जुलै, २०१६

सोमनाथ - गिरनार यात्रा Somnath-Girnar yatra - एक दिव्य अनुभव, जून २-५, २०१६ (प्रथमार्ध- सोमनाथ दर्शन)

प्रस्तावना  : 

...'गिरनार यात्रेला जाणे' ही प्रत्येक दत्तभक्ताच्या मनातील सुप्त इच्छा असते. आणि असणारच ना ? प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी १२,००० वर्षे तपश्चर्या केलेली पवित्र जागा. तिकडच्या एक पुजाऱ्याच्या शब्दात सांगायचे तर 'this is the place of the king of kings!'. आणि आहेच ते स्थान तसे ! साक्षात दत्तात्रेय व शिष्य गोरक्षनाथ यांचे वास्तव्य अजूनही तेथे आहे असे सांगितले जाते. दत्तात्रेयांच्या पवित्र अधिष्ठानामुळे गिरनार गुरुशिखराच्या ४० कि.मी. परिघात सर्व देवी-देवता वास्तव्य करतात असे तेथील पुजारी सांगतात.

अशा दुर्गम तरीही अतिशय सुंदर स्थानी जाण्याचा योग आला ही सद्गुरू कृपाच! 'तोच घेऊन गेला' असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या यात्रेचे यथासांग वर्णन खालील लेखात करण्याचा प्रयास करेन.

'अनिरुद्ध एव बुद्धिदाता ।'

यात्रा शुभारंभ (गुरुवार ०२/०६/२०१६)... प्रथम सोमनाथ दर्शन: 

गुरुवारी दत्तबाप्पाकडे निघायचे असल्याने आनंद द्विगुणित झाला होता. बांद्रा टर्मिनसहून दुपारी १३:३० वाजता निघणाऱ्या सूर्यनगरी सुपरफास्टने निघालो. नवीनच Group असल्याने आधी कोणी एकमेकांशी फारशे बोलत नव्हते. छोट्या छोट्या Groups मध्ये गप्पा-गोष्टी सुरू झाल्या. संध्याकाळी आरती-गजर घ्यायला सगळे ट्रेनमध्येच एकत्र आले आणि मग धम्माल सुरू झाली. कोण आरती , कोण गाणे तर कोणी मध्येच jokes  मारून एकमेकांना हसवत होते. रात्री ९ वाजता गुजरातमधील अहमदाबादला उतरलो.

रात्रीचे जेवण अहमदाबाद railway station जवळील Sunrise veg. restaurant (contact# 079 2214 5601) येथून parcel मागवले. लगेच, २२:०० ची वेरावळ जाणारी 'सोमनाथ एक्सप्रेस' पकडली.  रात्रीच्या थोड्या गप्पांनंतर सगळे झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजताच वेरावळला पोहोचलो. तेथून सोमनाथ ७-८ कि.मी. आहे. टमटमने २०-२५ मिनिटे लागतात. तिकडे अनेक धर्मशाळा आहेत, ज्या माफक दरात राहण्याची व्यवस्था पुरवतात.
इकडे आवर्जून सांगावेसे वाटते की तिकडचे पाणी हे बोरिंगचे असल्याने अतिशय क्षारयुक्त असते. त्यामुळे केस खूप चिकट होतात.

आंघोळ करून तयार होऊन 'सोमनाथ मंदिर'ला दर्शनाला निघालो. सोमनाथ मंदिरात half pant घालून येण्यास परवानगी नाही, याची भक्तांनी नोंद घ्यावी. गुजरातमधील 'सोरटी-सोमनाथ मंदिर' हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने अतिशय वर्दळीचे असते. हे मंदिर नेमके कधी बांधले गेले याची नेमकी नोंद सापडत नाही पण इ.स. ६४९ मध्ये याची पुनर्बांधणी यादव राजांनी केली असे सांगितले जाते. इतिहासात या मंदिरावर अनेक आक्रमणे झाल्याचा उल्लेख आहे. याचे कारण म्हणजे त्या काळात हे भव्य मंदिर पूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. यामुळेच १०२४ ला अफगाण राजा मोहम्मद गझनी पासून अगदी सोळाव्या शतकातील औरंगजेबाने या मंदिराची अनेक वेळा नुकसान करण्यात आले. तरीही पुन्हा पुन्हा हिंदू राजांकडून हे पवित्र मंदिर पुन्हा पुन्हा बांधले जायचे.

       " बांधणाऱ्याची ताकद ही नष्ट करणाऱ्याच्या ताकदीपेक्षा नेहमीच मोठी असते"

या उक्तीचा 'सोरटी-सोमनाथ मंदिर' हा जिवंत नमुना आहे. आता आपण पाहत असलेले भव्य मंदिर १९५१ साली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने बांधले गेलेले आहे.


                                            (छायाचित्र : सोमनाथ मंदिर, source internet)

मंदिरात जातानाच आमचा 'शिवपंचाक्षर मंत्रा'चा जप सुरू झाला. चालुक्य शैलीत बांधलेल्या मंदिराची भव्यता आणि सौंदर्य न्याहाळता न्याहाळता आपण हळू हळू मंदिर प्रांगणातून आत प्रवेश करतो. तांबड्या कोरीव दगडात बांधलेले त्या मंदिराच्या खांब/भिंती/छतावरील नक्षी पाहून मन हरपून जाते. 'कधीकाळी सोन्याच्या पत्र्यामुळे चकाकणारे हे मंदिर कसे दिसत असेल! ' हा विचार मनात येतोच. भव्यता आणि नाजूकता यांचा अप्रतिम संगम या मंदिराच्या बांधकामात ओतप्रोत भरलेला दिसतो.

मुखात 'शिवपंचाक्षर मंत्रा'चा जप करताच गाभाऱ्यात प्रवेश करताच समोरचे भव्य शिवलिंग पाहताच हात आपोआप जोडले जातात. गाभाऱ्यातील  नंदीचे दर्शन घेऊन आपण शिवलिंगाच्या जवळ येतो आणि मनसोक्त दर्शन घेऊन तृप्त होतो. ...आणि हो, सांगण्यासारखे असे की गाभाऱ्यातील सजावट आजही सोन्याच्या पत्र्याची आहे.


                                         (छायाचित्र : सोमनाथ मंदिर गाभारा , source internet)

सध्याच्या मुख्य मंदिराच्या बाजूला जुन्या मंदिराचा चौथरा दिसतो. मंदिराच्या आवरातच एक दालन आहे, ज्यात पुराणांमधील काही निवडक गोष्टी आहेत. मंदिर आवारात photographyला सक्त  मनाई असल्याने अनेक स्थानांचे photos internetवरुन घेतलेले आहेत.





                                      (छायाचित्र : सोमनाथ मंदिर रात्रीचे दृश्य , source internet)

बाणस्तंभ: मंदिर आवारात हमखास लक्ष वेधून घेते अशी वास्तु म्हणजे 'बाणस्तंभ'! या स्तंभावर एक संस्कृत श्लोक लिहिले ज्याचा अर्थ असा की "या स्तंभावरील बाण दक्षिण ध्रुवाची दिशा दर्शवितो आणि या स्तंभापासून दक्षिण ध्रुवापर्यन्त  सरळ रेषेत जलमार्गाने जाताना वाटेत एकही  भूखंड  नाही." मित्रांनो, शेकडो वर्षांपूर्वी हे लिहीणाऱ्या भारतीयांचे नौकानयन आणि भूगोलशास्त्र किती प्रगत होते, याचा विचार करून आपण दि:मूढ होतो.



                      (छायाचित्र : सोमनाथ मंदिर प्रांगणातील बाणस्तंभ, source internet)

जवळच अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार केलेले पुरातन शिव मंदिर आहे. या मंदिराचा बराचसा मोठा भाग भूपातळीपेक्षा खाली आहे(तळघरासारखा). असे म्हणतात, एका आक्रमणापासून वाचविण्यासाठी मुख्य सोमनाथ मंदिरातील देवता याच मंदिरात लपवून ठेवलेल्या. (तथापि, लिखित संदर्भ फारशे उपलब्ध नसल्यामुळे या गोष्टींची पुष्टी करता येत नाही.)

मंदिरापासून जवळच बाणगंगा म्हणून तीर्थ आहे, जिथे भर समुद्रात ३ शिवलिंग स्थापन केलेली दिसून येतात.


                                   (छायाचित्र : सोमनाथ मंदिराजवळील बाणगंगा तीर्थ)

तेथून पुढे आम्ही भालका  तीर्थला गेलो.पाय सोडून बसलेल्या श्रीकृष्णाला व्याधरूपी वालीने हरिणाचे अंग समजून बाण मारला. तो बाण शरीरात स्वीकारून श्रीकृष्णाने अवतारसमाप्ती केली, तीच ही पवित्र जागा. या प्रसंगानंतर द्वापारयुग संपून कलियुगाचा आरंभ होतो ही कथा आपण 'मातृवात्सल्य विन्दानम' ग्रंथात वाचतो. आम्ही गेलो तेव्हा तेथे नवीन मंदिराचे बांधकाम चालू होते.

                                (छायाचित्र : भालका तीर्थ मंदिरातील पाय सोडून बसलेला श्रीकृष्ण )

पुढे एका ढाबा type हॉटेलात मस्त 'गुजराती थाळी'चा lunch केला. ४-५ प्रकारच्या भाज्या, रोटी-रोटला, गुजराती कधी आणि विशेष म्हणजे पाण्या ऐवजी ताक! जेवणाचा सोहळा जबरजस्त झाला.


पुढे आम्ही सोमनाथ railway station वरून जुनागढला निघालो...गिरनारसाठी!

!!जय गिरनारी !!   

सोमवार, २३ मे, २०१६

श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं, निंबगाव,(Shree Aniruddha Punyakshetram,nimbgaon),अंमळनेर, धुळे …प्रथम भेट - मार्च २५, २०१६

हरि ओम - श्रीराम - अंबज्ञ ,

प्रस्तावना  : 

… वर्धमान व्रताधिराजाचे पवित्र उगमस्थान , आपले लाडके पणजोबा ( सद्गुरु अनिरुद्ध बापूंचे मानवी सद्गुरु) श्री गोपीनाथशास्त्री पाध्ये यांच्या उपासनेने पावन झालेली तपोभूमी आणि आपल्या संस्थेचे एक तीर्थक्षेत्र  इतकीच काय ती श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रंची माहिती होती आम्हाला ! आपल्या लाडक्या dad ने या स्थानाची माहिती सांगितल्यापासून 'श्री अनिरुद्ध पुण्यक्षेत्रं, नीमगाव' काय असेल, याची उत्सुकता लागून होती. पण न जाणो का, जायचा योगच येत नव्हता!

यावेळी ' कोल्हापूर medical कॅम्प - २०१६' वरून परतताना आमच्याबरोबर बसमध्ये नीमगावचे २ कार्यकर्ते होते. त्यांच्याबरोबर अनुभवसंकीर्तन करताना श्री अनिरुद्ध पुण्यक्षेत्रंबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टी नव्याने कळल्या.…आणि मग काय पुण्यक्षेत्रंला जायचे बसमध्येच ठरले!

 -----(पुण्यक्षेत्रं भेट : गुरूवार मार्च २४  , २०१६ या सुचितदादा-समिरदादांच्या वाढदिवशी )--------

पुण्यक्षेत्रंवरून परतल्यावर इतर बापूभक्तांशी बोलताना असे जाणवले की या पवित्र स्थानाची २००५ साली स्थापना झालेली असूनही लोकांना याबद्दल फारच थोडकी माहिती आहे. म्हणून तेथून परतल्यानंतर त्या स्थानाबद्दल माहिती गोळा केली (संदर्भ जागोजागी दिले आहेत).

… हा माहितीचा गोडगोड ठेवा सर्वांना मिळावा हीच सदिच्छा! अंबज्ञ !

(तुमच्याकडे अधिक माहिती असल्यास  / दिलेल्या माहितीत काही त्रुटी आढळल्यास खाली comment section मध्ये कळवावे हि सविनय प्रार्थना)

श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं स्थापना माहिती : 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरपासून २७ कि.मी. अंतरावरील नीमगाव येथे तापी आणि पांझरा या नद्यांच्या पवित्र संगमावर श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रंची स्थापना dad करणार याची माहिती सर्वप्रथम मार्च १७, २००५ साली प्रवचनापूर्वी देण्यात आली.

(संदर्भ : स्टार वृत्त श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं विशेषांक, मार्च ३१, २००५; या लेखाला जोडलेला आहे. स्पष्ट दिसत नसल्यास download करून zoom करून वाचावा )



याच प्रवचनात बापूराया म्हणालेला कि " या ठिकाणी आपण पहिल्यांदा उभारणार आहोत दोन गोष्टी; पहिले म्हणजे अत्यंत सुरेख आणि अत्यंत सुंदर असे मंदिर. त्या मंदिरामध्ये काय असणार आहे? दत्तगुरुंची मूर्ती मध्ये उभी आहे. त्यांच्या उजव्या बाजूला श्रीपाद श्रीवल्लभ तर डाव्या बाजूला स्वामी नृसिंह सरस्वती अशा तीन मुर्ती. त्याच ठिकाणी माझे मानवी सद्गुरु गोपीनाथ शास्त्रींच्या अस्थि, ज्या माझ्या आजीने आणि आईने सांभाळून ठेवल्या आहेत; त्यांची स्थापना करून समाधी बांधण्यात येणार आहे. दत्तगुरूंच्या त्रिमूर्ती आणि गोपीनाथ शास्त्रींची समाधी अशा माझ्या भावनांशी निगडीत, माझ्या आदराची, माझ्या प्रेमाची, माझ्या वात्सल्याची स्थाने स्थापन करतोय पुण्यक्षेत्र म्हणून! (या दोन्ही वास्तूंची अद्याप स्थापना dad ने केलेली नाही याची भक्तांनी नोंद घ्यावी) ते सद्गुरु क्षेत्र असेल की , जिथे प्रवेश करणे म्हणजे साक्षात देव लोकात प्रवेश करण्यासारखे आहे!…. अंमळनेरपासून थोड्या अंतरावर असणारे हे लहानसे गाव कधी जगाच्या नकाशावर जाउन पोहोचेल हे आम्हाला कळणार नाही,  इतकी या जागेची ताकद आहे " .


(छायाचित्र : श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं जागा येथून सुरु होते)

लेकरांसाठी बापूरायाचे प्रयास: 

१ एप्रिल २००५ च्या ऐन उन्हाळ्यात dad अंमळनेर आला.….आला तोच नीमगावला निघाला. आज त्याला पणजोबांनी उपासना केली 'ती' टेकडी आणि 'ती' शिळा शोधायची होती! ज्या रणरणत्या उन्हात heat -strokeच्या भीतीने गावातले कष्टकरीही फिरायचे टाळतात , तिथे हा बाप आमच्यासाठी 'ती' टेकडी शोधत होता.  हो…छत्री धरायला volunteer होता, पण शोधाच्या ध्यासाने लांब पावले टाकणाऱ्या dad च्या मागे धावताना त्या volunteer ची दमछाक होत होती .…अणि सापडली 'ती' टेकडी ! … अर्धे mission  successful  ! पांझरानदी कांठी 'ती' टेकडी आजही बापूने 'जशीच्या तशी' ठेवली आहे. तेव्हा होती तशी …पुढच्या लाखो वर्षांसाठी !

… आता तसाच नदीच्या उन्हात तापलेल्या पात्रातून  'हा' निघाला …'ती' शिळा शोधण्यासाठी! सोबत असलेल्या मोजक्या volunteer ना एव्हाना घामाची आंघोळ झाली होती. बापूराया म्हणाला" आपल्याला आता एक शिळा शोधायाचेय". तापी नदीच्या पात्रात अशा अनेक शिळा होत्या . प्रत्येक शिळेकडे बोट करून volunteer  दाखवत होते …पण नाही! 'ती' शिळा काही सापडली नाही! दिवस मावळला, dad  मागे फिरला, अमळनेरला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध मोहीम चालू! …पण आज 'ती' शिळा सापडली. जय जगदंब जय दुर्गे! बापुरायाच्या आनंदाला पारावर उरला नाही. खरंच, तापी नदीच्या त्या विशाल पात्रात अशा अगणित शिळा आहेत त्यांतून dad ने नेमकी 'ती' शिळा कशी शोधून काढली, त्याला माहित!

पुढे सद्गुरु पुण्यक्षेत्रंमध्ये मूळ  जागेची originality  तशीच ठेवून अनेक सुधारणा करण्यात आल्या. आज त्या जागेत Dormitory, kitchen, शेती, compound, उपासना कुटीर बांधली आहेत.  तरीही , तेथे एक साधीशी shed बांधायलासुद्धा समीरदादा/सुचितदादा यांची परवानगी घ्यावी लागते , हे सांगायला तेथील local volunteers विसरत नाहीत. आपल्या लेकरांना ती जागा 'जशीच्या तशी' पाहायला मिळावी हा dad चा त्यामागचा आग्रह! त्यामुळे तिथे येणारा कधीच 'उशिरा' येत नाही. अशा या काळाच्या पलीकडे असलेल्या पवित्र स्थानाची अधिक माहिती आणि काही सुंदर stories ऐकायला तुम्ही जेवढे उत्सुक आहात त्यापेक्षा त्या अवीट गोड गोष्टी सांगायला मी उताविळा आहे.



(छायाचित्र :श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रंमधील Dormitory)


(छायाचित्र : श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रं परिसर. या विभागात असणारी कडूनिंबाची झाडे यागावाचे 'नीम' हे नाव सार्थ करतात)

।। हरि ओम - श्रीराम - अंबज्ञ ।।